आता एसटी बस मध्ये जुलै महिन्यापासून महिलांप्रमाणे पुरुषांना सवलत – परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
एसटी महामंडळाच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीमध्ये मोठे बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, एसटीला देशातील सर्वोत्तम परिवहन संस्था बनवणे हेच आपले उद्दिष्ट आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे, यासाठी एसटीला नव्या पातळीवर घेऊन जाण्याचे काम केले जाणार आहे.
एसटीचा दर्जा आणि भविष्यातील योजना
मंत्री सरनाईक म्हणाले की, गेली ७७ वर्षे एसटीने राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत सेवा पोहोचवली आहे. पाऊस, ऊन, वारा यांची तमा न बाळगता एसटीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यामुळेच ही संस्था इतकी वर्षे टिकून राहिली. भविष्यात एसटी शंभर वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, लवकरच प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक ‘स्मार्ट एसटी’ मिळणार आहे.
१५ टक्के सवलतीची नवीन योजना
लांब पल्ल्याच्या प्रवासात आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के तिकीट सवलत देण्याची योजना जुलैपासून सुरू होणार आहे. गर्दी नसलेल्या काळात प्रवाशांची संख्या वाढावी, या हेतूने ही सवलत दिली जाणार आहे. याचा फायदा ‘ई-शिवनेरी’सारख्या बसने प्रवास करणाऱ्यांना होणार आहे.
बदल्या ऑनलाईन पद्धतीने
एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने पार पडतील. या योजनेत पारदर्शकता राखली जाईल आणि सेवा जेष्ठतेनुसारच बदल्या होतील. आंतर प्रादेशिक, प्रदेशांतर्गत आणि विभागीय बदल्याही याच पद्धतीने होतील.
कर्मचाऱ्यांचा सन्मान
कार्यक्रमात ‘बस फॉर अस’ या संस्थेने एसटीचा ७७ वर्षांचा प्रवास चित्ररूपात सादर केला. ‘एसटीचा वाहननामा’ हे कॉफी टेबल पुस्तकही यावेळी प्रकाशित करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘अध्यक्ष सुवर्णपदक’ देऊन गौरविण्यात आले. तसेच अपघातमुक्त सेवा देणाऱ्या चालकांचा आणि विश्वकर्मा पुरस्कार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.