SSC HSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (MSBSHSE) घेण्यात आलेल्या 2025च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही अपेक्षेपेक्षा लवकर लागणार असल्याचे संकेत मंडळाकडून देण्यात आले आहेत.
बारावीचा निकाल कधी लागणार?
बारावीची परीक्षा यंदा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च 2025 दरम्यान झाली. परीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर आणि मुंबई विभागांतील उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. शिक्षण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, म्हणजेच १५ मे 2025 च्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.
दहावीचा निकाल कधी लागणार?
दहावीची परीक्षा यंदा २१ फेब्रुवारी 2025 पासून घेण्यात आली होती. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि बोर्डाने दिलेल्या माहितीप्रमाणे १७ ते १८ मे 2025 दरम्यान दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) 2025 च्या निकालासाठी खालील अधिकृत वेबसाईट्सवर तुम्ही निकाल पाहू शकता:
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्स
- mahresult.nic.in – मुख्य आणि अधिकृत निकाल पोर्टल
- mahahsscboard.in – राज्य मंडळाची अधिकृत वेबसाईट
- result.mh-ssc.ac.in – SSC निकालासाठी
- result.mh-hsc.ac.in – HSC निकालासाठी
निकाल पाहण्यासाठी काय लागेल?
- तुमचा Seat Number (बैठक क्रमांक)
- कधी कधी Mother’s First Name (आईचे पहिले नाव) विचारले जाते
उत्तरपत्रिका तपासणीचे तपशील
छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जिल्ह्यांमध्ये ४६० केंद्रांवर बारावीची परीक्षा पार पडली होती, ज्यामध्ये १ लाख ८५ हजार ३३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. लातूर विभागात तीन जिल्ह्यांमधून ९५ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, जी २४९ परीक्षा केंद्रांवर पार पडली. परीक्षा संपल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका शिक्षकांकडे तपासणीसाठी देण्यात आल्या. उत्तरपत्रिकांचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तपासलेल्या उत्तरपत्रिका ८ एप्रिल 2025 पर्यंत मंडळात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि बहुतेक उत्तरपत्रिका या वेळेत जमा झाल्याची माहिती मिळाली आहे.
निकाल लवकर लागण्याचे फायदे
यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात निकाल लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारी तयारी, कागदपत्रे, आणि कॉलेज निवडण्यास मदत होणार आहे.