रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी : आता तीन महिन्यांचे धान्य एकत्र मिळणार! शासनाचे परिपत्रक
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो. या योजनेचा लाभ लाखो कुटुंबांना नियमित स्वरूपात दिला जातो.
आगामी पावसाळा हंगामात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर व इतर प्रतिकूल हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नधान्य वितरणात अडथळे निर्माण होऊ शकतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र शासनाने विशेष निर्देश दिले आहेत.
या निर्देशानुसार, सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य अगोदरच म्हणजे ३० जून २०२५ पूर्वी रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

क्षेत्रीय यंत्रणेस अन्नधान्याचे तातडीने वितरण करण्यास सूचित करण्यात आले असून, वितरण प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
तरी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अन्नधान्य ३० जून २०२५ पर्यंत रास्तभाव दुकानांमधून उचलावे, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.