सावध रहा! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा – हवामान खात्याचा अलर्ट
महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेपेक्षा 12 दिवस आधी दाखल झाला असून कोकणात जोरदार पाऊस झाला आहे. मात्र, काही भागांमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आजपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर
राजस्थान भागात निर्माण झालेल्या वादळी प्रणाली आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार दिवस हवामानात बदल जाणवतील. काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता असल्याने उकाडा जाणवू शकतो.
हवामान विभागाने अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या 11 जिल्ह्यांमध्ये वादळ, विजांसह पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन-चार दिवस जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील 15 गावांचा संपर्क तुटला
बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे वडवणी तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला आहे. अमरावती आणि धाराशिव जिल्ह्यांत अल्प वेळात इतका पाऊस झाला की अनेक रस्ते पाण्याखाली गेले.